Monday, September 18, 2023

(बोधकथा) ... आणि गुराख्याने सिंहाची गोष्ट ऐकली नाही


कुठल्यातरी एका गावात एक गुराखी राहत होता. तो  गावातल्या गाई-म्हशी जवळच्या जंगलात चरायला न्यायचा.एक दिवस त्याने जंगलात गुरांना हिरवे लुसलुशीत गवत चरायला सोडले होते. तिथे त्याने पाहिले की, सिंह आणि सरड्यामध्ये भांडण लागलं आहे. सिंह आपल्या पंज्याने सरड्याला पकडायचा प्रयत्न करायचा,पण तेवढ्यात सरडा त्याच्या नाकात घुसून त्याचा चावा घ्यायचा. सिंह वेदनेने ओरडायचा आणि शिंकून सरड्याला बाहेर काढायचा. सिंह त्याला वारंवार पकडण्याचा प्रयत्न करायचा, पण सरडा काही त्याच्या तावडीत सापडत नव्हता. हे सगळं गुराखी पाहत आहे, हे सिंहाने पाहिले. सिंहाला स्वतःचीच लाज वाटली. तो विचार करू लागला, जर या गुराख्याने गावातल्या सगळ्यांना सांगितलं तर माझी काय इज्जत राहील? त्यापेक्षा याला समजावून सांगू. 

'ये गुराख्या!  घाबरू नको.  माझ्याकडे ये, मी तुला काहीही करणार नाही.'' सिंह संकोचून  म्हणाला.

गुराखी घाबरत घाबरत म्हणाला, ' काय म्हणता वनराज ?' 'सिंहाला सरड्याकडून पराभव पत्करावा लागला, हे कोणाला सांगू नकोस. माझी सगळी इज्जत  मातीमोल होईल.'  सिंह पुढे इशारा देत म्हणाला, ' जर कुणाला कळल तर त्यादिवशी तुझी काही खैर नाही. कळलं का?' गुराखी सिंहापुढं काय बोलणार! त्याची बोबडीच वळली. त्याने शपथ घेतली की, ही घटना कोणाला सांगणार नाही. 

रात्री जेवण करून गुराखी बाहेर खाटेवर आडवा झाला. अचानक त्याला दिवसाची घटना आठवली. तो हसला.बायकोने विचारले, 'काय झालं?' गुराख्याला मग आणखी हसू येऊ लागलं. 

त्याच्या बायकोला तर काहीच कळेना.  ' काय झालं मला सांगाल की नाही? का तुम्हाला जंगलातल्या भूतानं पछाडलंय?' 

कसं तरी हसू आवरत गुराखी म्हणाला, 'दुपारी एक गोष्ट घडली, ती आठवली, बाकी काही नाही.'

“मला पण सांगा,” बायको म्हणाली, “मी तुला सांगू शकत नाही आणि सांगितलं तर तू विधवा होशील. सिंह मला मारून टाकेल.

सिंह तुम्हाला मारायला काय तो थोडंच  इथं आहे? त्याला कसं कळणार? ते काही नाही मला तुमच्या हसण्याचं कारण कळलंच पाहिजे.'

गुराख्याचं त्याच्या बायकोपुढं काही चाललं नाही. तो शेवटी समजावत म्हणाला,  'गावात कोणाला सांगू नकोस.  सिंहाला कळलं तर समज माझा मृत्यू निश्चित आहे. त्याने दुपारी जंगलात घडलेला सगळा प्रकार बायकोला सांगितला.  मग काय!सकाळ होताच त्याच्या बायकोने तो शेजाऱ्या-पाजाऱ्यांना सांगितला. बघता बघता तो सिंहापर्यंत पोहचला. दुसऱ्या दिवसापासून गुराख्यानं जनावरं घेऊन जाणं बंद केलं. सिंह त्याला ठार मारेल, याची पक्की भीती त्याला बसली.

तात्पर्य- तुम्ही जे काही बोलाल ते विचारपूर्वक बोला.

-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली 


No comments:

Post a Comment