Tuesday, September 15, 2020

बुद्धीची ताकद


एकदा सुकरात आपल्या शिष्यांसोबत कोणत्या तरी विषयावर बोलत बसले होते. तेवढ्यात तिथे एक ज्योतिष आला आणि म्हणाला,"मी ज्ञानी आहे. मी कुणाचाही चेहरा पाहून त्याचे चरित्र काय आहे, हे सांगू शकतो. सांगा,तुमच्यापैकी कोण माझी ही विद्या पारखू इच्छितो."

सुकरातनी त्याला आपल्याविषयी सांगायला सांगितले. ज्योतिषाने  काही वेळ त्यांना निरखून पाहिलं आणि म्हणाला,"तुमच्या चेहऱ्याची ठेवण सांगते की, तू सत्तेविरुद्ध आहेस.तुझ्या अंगी द्रोह करण्याची भावना प्रबळ आहे. तुझ्या डोळ्यांभोवती ज्या सुरकुत्या आहेत. त्या तू अत्यंत रागीट असल्याचे प्रमाण देतात." 

हे सर्व ऐकून शिष्यगण संतापले. पण सुकरातनी त्यांना गप्प बसवले. ज्योतिष पुढे म्हणाला,"तुझे बेढब डोके आणि कपाळावरून तू खूप लोभी आहेस, हे कळते."

सुकरातनी त्याला बक्षीस दिलं आणि निरोप दिला. शिष्य मंडळी आश्चर्यात पडले. गुरूंचे वागणे त्यांच्या पचनी पडेना. 

सुकरात त्यांना समजावत म्हणाले,"ज्योतिषाने सांगितलेले सगळे अवगुण माझ्यात आहेत. पण त्याला माझ्यातल्या विवेक ओळखता आला नाही. या विवेकामुळेच मी माझ्यातल्या अवगुणांवर विजय मिळवला आहे. तो इथेच चुकला, माझ्या बुद्धीची ताकद त्याला ओळखता आली नाही."

तात्पर्य:बुद्धीचा वापर करून आपण आपल्या अवगुणांवर विजय मिळवू शकतो.

Wednesday, September 2, 2020

राजा आणि चोर


भगवान महावीरसोबत एक लहान मुलगा बसलेला  असताना त्यावेळेस तिथून एका चोराला काही शिपाई पकडून नेत होते, त्या मुलाने भगवान महावीरांना विचारले "तो कोण आहे आणि त्याच्या भोवती शिपाई का आहेत?"

महावीर म्हणाले "तो चोर आहे, त्याला पकडले आहे, त्याला आता शिक्षा होईल व तो तुरुंगात जाईल". थोड्या वेळा नंतर त्या नगरीचा राजा येत होता आणि त्याच्या भोवती पण शिपाई होते, त्यावेळेस मुलगा लगेच महावीरांना म्हणाला " तो बघा अजून एक चोर आला", महावीर म्हणाले "तो राजा आहे." मुलगा महावीरांना म्हणाला " या दोघात काय फरक आहे ? राजा भोवती पण शिपाई आहे आणि चोरा भोवती पण शिपाई होते."

महावीर म्हणाले "जमीन आसमानचा फरक आहे, त्या चोराच्या भोवती जे शिपाई होते त्यांच्या ताब्यात तो चोर होता, त्याला काहीही करायचे स्वातंत्र नाही, शिपाई जिकडे नेतील तिकडे जायचं, शिपाई जिथे ठेवतील तिथे राहायचे, देतील ते खायचं, त्याला स्वतःच्या मनाने काहीच करता येत नाही. कारण तो बंदिस्त आहे.....परंतु राजाच्या भोवती जे शिपाई आहेत ते राजाच्या ताब्यात आहेत, राजा सांगेन तिकडे ते राजा बरोबर जातील, राजा जे काही सांगणार ते सर्व ते करणार, जर राजा बोलला कि तुम्ही जा, मला एकटे राहू देत, तर निघूनही जातील, कारण राजा मुक्त आहे."

तात्पर्य-"आपले मन, आपल्या भावना म्हणजे द्वेष, तिरस्कार, राग, लोभ, मत्सर, अहंकार, असूया, कपट, गर्व हे सर्व विकार आपले शिपाई आहेत, आपण त्यांच्या ताब्यात असलो तर आपण 'चोर' आहोत, ते आपल्या ताब्यात असले तर आपण 'राजा' आहोत.   निवड तुमची आहे."

Tuesday, September 1, 2020

मित्रांविषयी


एके दिवशी एक व्यक्ती महान चाणक्याला भेटली आणि म्हणाली, 'मी तुमच्या मित्राबद्दल जे काय ऐकले ते तुम्हाला मी सांगू का?'

'एक मिनिट थांबा' चाणक्याने उत्तर दिले.

'काही सांगण्यापूर्वी मी थोडीशी तुमची परीक्षा घेतो, परीक्षेत उत्तीर्ण झालात तरच सांगा, आपण याला ट्रिपल फिल्टर चाचणी असे म्हणू...... चालेल?"

ती व्यक्ती म्हणाली, "तिहेरी फिल्टर? ठीक आहे."

चाणक्य पुढे म्हणाला. 'माझ्या मित्राबद्दल माझ्याशी बोलण्यापूर्वी. तुम्ही जे काय म्हणणार आहात, ते फिल्टर करणे चांगले आहे. म्हणूनच मी त्याला तिहेरी फिल्टर चाचणी म्हणतो."

"आता पहिला फिल्टर, तुम्ही जे सांगणार आहात, ते सत्य आहे का?'

थोडसं थांबून ती व्यक्ती म्हणाली 'नाही.' 'खरंच मी त्याबद्दल ऐकले."

"आणि...'

"ठीक आहे.' चाणक्य म्हणाले तुम्ही जे मला सांगणार आहात ते खरं आहे. याची खात्री नाही तुम्हाला?...

आता दुसरा फिल्टर! आता चांगुलपणाचे फिल्टर वापरून पाहूया. आपण माझ्या मित्राबद्दल काही तरी सांगणार आहात ते त्याच्या बद्दलचे चांगले विचार आहेत काय?'

ती व्यक्ती म्हणाली 'नाही, उलट...' 'मग, मधेच तोडत चाणक्य पुढे म्हणाले,'तू मला त्याच्याबद्दल काही तरी वाईट सांगू इच्छित आहेस आणि ते खरे आहे की नाही याची शाश्वती नाही. ठीक आहे! आता उपयुक्तता फिल्टर! हा शेवटचा फिल्टर..... ! जे तू मला माझ्या मित्राबद्दल सांगणार आहेस ती माहिती मला उपयोगी असणार आहे"

"काय?'

'नाही, तशी तुम्हाला ती उपयुक्त खरंच नाही." ती व्यक्ती ओशाळत म्हणाली.

"ठीक आहे.' म्हणजे 'जर तुम्ही मला सांगू इच्छिता,

ते ना सत्य आहे. ना चांगले आहे. ना मला उपयोगी आहे. तर मला ते का सांगता आहात?'

तात्पर्य- प्रत्येक  वेळी आपल्या जवळच्या प्रियजनांबद्दल, मित्रांबद्दल ऐकताना या तिहेरी फिल्टरचा वापर करा. हे तिहेरी फिल्टरच खरोखर खूप उपयुक्त आहे. तुमचे नाते टिकवण्यासाठी!!!